"काय गं, काय झालं? अशी उदास का?"
"फारसं काही नाही. फक्त तो रुसून बसला आहे बघ. भेटल्यापासून कसा रुक्ष रुक्ष वागतो आहे."
"असं काय केलंस?"
"मला इकडे जाग आल्यापासून तुझी आठवण येते आहे, हे भेटल्या भेटल्या सांगितलं त्याला."
"अशी कशी गं वेडी तू? जरा अक्कल वापरायची."
"खरं ते खरं. आणि आपल्याच कोणाशी खोटं का बोलू? तुझ्या कुशीत होतं ते सुख इकडे कुठे?"
"समजूत काढायला तरी सांगायचं, माझ्यासोबत असताना त्याची आठवण येत होती म्हणून."
"त्याची आठवण आली असं धडधडीत खोटं सांगू तरी कसं?
कधी ऐकलं आहेस का रे, स्वप्नासोबत असताना वास्तवाची कोणाला आठवण आल्याचं?"
तो मौन...
हा रुक्ष...
ती?
ती मात्र वास्तव आणि स्वप्नामध्ये असलेल्या नाजूक तारेवरची कसरत करायला पुन्हा नव्याने उभी!
आणि
ती - प्रत्येक ऋतूश्वासात भेटून देखील आत्म्याला अधिक जवळचा वाटणाऱ्या, डोळे आणि मन शांत ठेवणाऱ्या, ध्यानस्थ स्वप्नाच्या कुशीत हरवून जावं वाटत असतानादेखील हर ऋतूश्वासागणिक रूप बदलणाऱ्या वास्तवाचा स्वीकार करायला नेहमीप्रमाणेच नव्याने तयार एक सामान्य व्यक्ती...!)
✍🏼⚡© सोनल थोरवे

No comments:
Post a Comment