"या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाची निर्मिती करण्यामागे देवाचा विशेष हेतू असतो. विशिष्ट कार्यासाठी प्रत्येक जण इथे अवतरतो. आपण सर्व जन्मतः त्या दैवी शक्तीचा, अग्निबिंदूचा अंश अंतरात घेऊन येतो. त्या अग्नीला पंख लाभावेत यासाठी आयुष्यभर आपण प्रयत्न करत राहावे आणि मग त्या प्रकाशाने जग मांगल्याने भरून जावे."
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (अग्निपंख)
काळ एके दिवशी प्रत्येकालाच त्याच्या
सोबत घेऊन जातो.
त्यानंतर सोबत राहतात त्या आठवणी.
२७ जुलै, २०१५... भारताच्या सर्वांत लाडक्या अशा पुत्राला काळाने हात दिला, आणि त्यानेही तो समाधानपूर्वक स्वीकारला. आपले लाडके आणि आदर्श व्यक्तिमत्व, 'मिसाइल मॅन’, डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना काल भौतिक विश्वाने अखेरचा सलाम केला.
आपणा सर्व युवकांचे प्रेरणास्थान, डॉ. अब्दुल कलाम, हे त्यांच्या विचारांप्रमाणेच प्रत्यक्षात देखील अंतरातील अग्नीला पंख देऊन, राष्ट्राला स्वप्न पहायला शिकवून आणि ती पूर्ण करण्यासाठी मने प्रज्वलीत करून काळाच्या पडद्याआड गेले, तरी सर्वांच्या मनःपटलावर ते नेहमीच विराजमान राहतील. या अग्नीच्या प्रकाशाने जग नेहमीच मांगल्याने भारून जाईल.
या प्रकाशाचे कण वेचण्यास प्रयत्नशील,
सोनल.
