(2012 मध्ये आईबरोबर, आणि नंतरच्या वर्षी राणीबरोबर एका स्वयंसेवी संस्थेसोबत जास्त नाही पण काही किलोमीटर वारीमध्ये चालायचा योग जुळून आला. ही देहू-आळंदीहून निघालेली हजारों मंडळी शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपूरवासी विठ्ठल-रखुमाई चे नाव घेत छान टाळ-मृदुंगाच्या तालावर हसत-नाचत त्यांच्या ओढीने चालत होती. यांच्या या उत्साहाचे कारण काय असावे असा प्रश्न पूर्वी सारखा मनात यायचा खरा; पण या वेळी उत्तरात सामील होण्याचेच जणू भाग्य लाभले.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विठाईच्या गजरात हरपले देहभान।
ना ही पायी रे वहाण, नाही भूक ना तहान।।
माथी तुळस पावन करी पापांचे क्षालन।
माय रखुमाईरूप प्रेम आनंदाचा घन।।
टाळ-मृदुन्ग तालांत, नाम हरीचे मुखांत।
वर फाटले आभाळ तरी नाचतो सुखांत।।
चोखा, सावता नि तुका, ज्ञाना झाले एकरूप।
साऱ्या डोळ्यांत सावळा हरी दिसे मायबाप।।
रग नाही पायां परि ओढ विठू-दर्शनाची।
बळ देते चालावया दिव्य साथ अभंगांची।।
तिथे चंद्रभागेतीरी दोन्ही कर कटावरी।
वाट पाही लेकरांची उभा विटेवरी हरी।।
😇 सोनल
