आठ दिवसांपूर्वी मैत्रिणीचा फोन आला होता, "सोने, चंद्र-ग्रहण सुरू असताना काय काय पाळायचं असतं सांग ना."
सख्खी मैत्रीण म्हटल्यावर सात्विक संताप आला पहिला... ही भौतिकशास्त्र पदवीधर, हिला शास्त्र (विज्ञान) माहीत आहे आणि हे काय? हे ही माहीत आहे, मी खगोल-अभ्यासक, या असल्या अंधश्रद्धा जुमानत नाही, तरी मला का हा प्रश्न?
प्रामाणिकपणे सांगायचं तर मी ओरडलेच बिचारीवर, "हे असले प्रश्न मला का विचारतेस?" ('फालतू' हा शब्द जिभेवर असून हुशार ओठांनी गिळला होता). आणि, मनातल्या मनात त्या क्षणात झालेला संवाद - "आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो कोणताही प्रश्न फालतू नसतो, न भीती बाळगता प्रश्न विचारत जा. मग, फक्त मैत्रीण, ती ही शास्त्र शाखेची पदवीधर म्हणून काही गोष्टी गृहीत धरून तिच्या प्रश्नामुळे तिच्यावर चिडणं गैर नाही का?"
मग विचारलं, "काय झालं? नीट सगळं सांग."
"झोपले होते, आता सासूबाई घाबरून गेल्या आहेत. गरोदर बायकांनी ग्रहणात झोपायचं देखील नसतं, होणाऱ्या बाळासाठी चांगलं नसतं. भाज्या चिरायच्या नाहीत, घराबाहेर पडायचं नाही इ. सगळं पाळलं, पण झोप लागली बघ. आता? तू सांग ना, खरंच काही फरक पडतो का गं ग्रहणाचा आपल्यावर? तसं मला पण पटत नाही, पण मला घाबरवून ठेवलंय बघ. तुझा या विषयाचा अभ्यास आहे, तुला सगळं खरं माहीत आहे म्हणून तुला विचारते आहे."
डोक्यावर बर्फ पडला, आणि ग्रहणाचा माणसाच्या जीवनावर, शारीरिक व मानसिक तब्येतीवर, इतकंच नव्हे तर अगदी वातावरणावर देखील परिणाम होत नाही, हे तिला समजावून सांगितलं. तिलाही बरं वाटलं माझ्या तोंडून ऐकून जे मनातून तिलासुद्धा पटू पाहत होतं.
आता मी काही मानसशास्त्राची रूढ विद्यार्थी वगैरे नसले तरी अनुभवांवरून (स्वतःच्या तसेच इतरांच्या देखील) इतकं नक्कीच समजलं आहे माणसाचं मन फार संवेदनशील असतं. एखादी अभूतपूर्व घटना अनाहूतपणे घडली तर ते कावरंबावरं होतं, काळजाचा ठोका चुकतो. अशात, जेव्हा माणसाला रोज दिसणारा सूर्य, ज्याच्या जीवावर अंधार सरताच गुहेबाहेर पडून अन्न-पाणी शोधता येतं, प्रकाश आणि ऊब मिळते तोच अदृश्य झाला तर??? त्यात जीवाला माहीत असलेला मोठा धोका हिंस्त्र श्वापदांचाच... मग त्यांतूनच भयंकर राक्षस, श्वापदांच्या गोष्टी तयार झाल्या तर त्यात आश्चर्य काय? या गोष्टी एकाकडून दुसऱ्याकडे पसरत गेल्या तर भीती अशी संसर्गजन्य रोगासारखी पसरायला टपलेलीच असते. आल्या अंधश्रद्धा जन्माला. त्या बिचाऱ्या निर्जीव चंद्र-सूर्याला माहीत देखील नाही त्यांच्या जीवावर पृथ्वी नामक कोण्या ग्रहावरच्या मानव नामक कोण्या प्राण्याने काल्पनिक राक्षस केव्हा पाठवून दिले, आणि त्यांना कळत देखील नाही अशा नैसर्गिक घटनांना केव्हा स्वतःशी जोडून खलनायक रूप दिलं.
तेव्हा ठीक होतं, अभ्यासाला साधनांची कमतरता होती. चौकस आणि शोधक बुद्धीची उत्क्रांती हळूहळू होत गेली. अनेक शतकांच्या निरीक्षणांनंतर, सखोल पाठपुराव्याच्या आधारावर त्या काळात अनाहूत वाटणाऱ्या घटना या periodic किंवा ठराविक कालांतराने सातत्याने घडत असतात हे समजले आहे.
तसेच, ग्रहणे ही फक्त प्रकाश अडल्याने पडलेल्या सावलीचा खेळ आहेत हे समजले आहे. सावली पडल्याने वातावरण दूषित होत असते तर आपल्या आजूबाजूला, आपल्याच सावल्या जास्त वेळ वावर करतात त्यांचा परिणाम वर्षातून काही मोजक्या मिनिटांसाठी पडणाऱ्या चंद्राच्या सावल्यांपेक्षा अधिक व्हायला हवा होता, असे नाही वाटत का? रात्र म्हणजे देखील सूर्य-प्रकाशित अर्ध्या गोलाची (पृथ्वीची) मागच्या अर्ध्या गोलावर पडलेली सावलीच की.
वैयक्तिक सांगायचं झालं तर निर्जीव ग्रह-तारे यांना आपल्या (सजीवांच्या) अस्तित्वाची कल्पना देखील नाही. मग त्यांनी कोणावर आणि का डूख धरावा हा माझा भाबडा प्रश्न. असो...
तर, मुद्दा हा की एकदा सत्य समजल्यास पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धांना फाटे देताना धाकधूक होणे स्वाभाविक आहे. कारण, संवेदनशील तसेच बरेचदा चंचल स्वभाव असल्याने आपल्यासोबत काही चुकीचं किंवा वाईट घडलंच तर त्याची जबाबदारी आपण एखाद्या अनोळखी, किंवा न समजणाऱ्या घटनेवर, वस्तूवर ढकलून देतो. त्यामागे कारण असलेल्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी बरेचदा आपल्या मनाची तयारी नसते, वेळ घालवायचा नसतो वगैरे कारणं असतातच. आणि अंधश्रद्धा मुरत जातात, एका पिढीतून दुसरीत पुढे दिल्या जातात.
यांतील काही अंधश्रद्धा या जीवघेण्या असतात. जसे, ग्रहणात गरोदर स्त्रीने बाहेर पडायचे नाही, खायचे नाही, झोपायचे नाही. एखादीला अगदीच काही त्रास झाला या काळात, तरी अशा काही गोष्टी पाळल्याने, वेळेत उपचार न घेतल्याने बाळ-बाळंतीण दोघांना जीवावर बेतल्याच्या अनेक घटना अगदी 21व्या शतकात देखील घडलेल्या आहेत.
असे असताना आपण सर्वांनीच आपल्या जीवासाठी काय योग्य हे शास्त्रशुद्ध (वैज्ञानिक दृष्टिकोनातून) विचार करून ठरवण्याची सद्विवेकबुद्धी वापरावी इतकेच मला वाटते.
मुळातच विज्ञान-अभ्यासक व विज्ञान-प्रसारक असल्याने हे सर्व खरं तर गेली दोन दशके वेळ पडेल तसे नेहमीच इतरांना सांगत आले आहे. पण यावेळी प्रश्न अगदी सख्ख्या मैत्रिणीच्या जीवाचा होता, त्या बिचाऱ्या जीवाला अशा नाजूक काळात भीतीने ग्रस्त होऊन मानसिक त्रास होऊ नये ही तडफड साहजिकच आतून झाली. आणि माहीत नसलेल्या, असेच प्रश्न असू शकणाऱ्या, विज्ञान आणि अंधश्रद्धा यांत भरडल्या जाणाऱ्या, आणि हा प्रश्न विचारायला कोणी जवळचे, भरावशाचे नसलेल्या, आताच्या पिढीतील सर्वच मित्र-मैत्रिणींसाठी हे मांडण्याचा प्रपंच केला.
काही दिवसांत सूर्यग्रहण आहे. अर्थात, ते भारतातून दिसणार नाही. आणि वर लिहिल्याप्रमाणे इथून दिसले तरी घाबरण्याचे काहीच कारण नाही. तरी, ही संधी साधून एक हितचिंतक मैत्रीण म्हणून हे इथे share करत आहे.
✍🏼 सोनल थोरवे


No comments:
Post a Comment